Ticker

6/recent/ticker-posts

राजगृह नासधूस प्रकरणाचा मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने निषेध : आरोपींना अटक करण्यासाठी ना. यशोमती ठाकूर यांना निवेदन


वाशीम - दादर (मुंबई) येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह या निवासस्थानी मंगळवार, 7 जुलैच्या सायंकाळी अज्ञात समाजकंटकांनी केलेली तोडफोड व नासधूस प्रकरणाचा मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून या निंदनीय प्रकरणाचा सरकारने तातडीने तपास करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर हे जिल्हयाच्या दौर्‍यावर आल्या असतांना 8 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात त्यांना निवेदन देण्यात आले.
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे हिंदु कॉलनीत राजगृह बांधले असून काही काळ त्यांनी राजगृहातच घालविला असून लाखो पुस्तकांचे संग्रहालय त्या राजगृहात आहेत. राजगृह आंबेडकरी विचारांचे उर्जास्थान असून बहूजनांचा आधारस्तंभ आहे. राजगृहात संपूर्ण आंबेडकर परिवार राहते. प्रामुख्याने भारतीय बौध्द महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरनीय मिराताई आंबेडकर ह्या तिथे राहतात. या राजगृहावर दगडफेक करणे म्हणजे आंबेडकरी अस्मिता नष्ट करण्याचा हा जातीयवादी प्रयत्न आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबई शहर सीसीटीव्ही च्या निगराणीत असतांना राजगृहावर दगडफेक होणे ही शंकास्पद बाब आहे. सदर घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश द्यावे. अन्यथा राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतांना वंचित बहूजन आघाडीचे संतोष सरकटे, मानवी हक्क सुरक्षा दलाचे केंद्रीय सदस्य यादवराव भगत, अंकुश आठवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.