Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ : आज १५ व्यक्तींचे अहवाल पॉझीटीव्ह. : ग्रामीण भागात संसर्ग वाढला


वाशिम जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
आज १५ व्यक्तींचे अहवाल पॉझीटीव्ह
ग्रामीण भागात संसर्ग वाढला
(पहाटवारा न्युज नेटवर्क)
शुक्रवार, १२ जून २०२०
वाशीम - बाहेर जिल्हयातून जिल्हयात आलेल्या व्यक्तींच्या पॉझीटीव्ह अहवालासह त्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग होत असून त्यामुळे वाशीम जिल्हयातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्हयातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे एकेकाळी कोरोनामुक्त व ग्रीन झोनमध्ये असलेल्या वाशीम जिल्हयातील नागरीक चिंतेत सापडले आहेत. यासोबतच वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागही सतर्क झाला असून संसर्ग झालेली गावे व परिसर सिल करण्याची कार्यवाही सक्तीने करण्यात येत आहे.
 आज, १२ जून रोजी जिल्हा माहिती कार्यालय वाशीम यांच्याकडून आलेल्या कोरोना अपडेट आकडेवारीनुसार शहरातील निमजगा येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह’ आले आहेत. यामध्ये २८, ४५ व ३५ वर्षीय महिला, १३ व १६ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक, १० व ४ वर्षीय मुली आणि १० व ६ वर्षीय मुलांचा समावेश आहे. यासोबतच दिल्ली येथून आलेल्या एकता नगर, रिसोड येथील ४१ वर्षीय व्यक्तीला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच रिसोड तालुक्यातील कन्हेरी येथील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर महिला मुंबई येथून आली आहे.
 यासोबत मुंबई येथून भेरा (ता. मालेगाव) येथे आलेल्या अनुक्रमे २८ व २३ वर्षीय पती-पत्नीचे अहवालही पॉझिटिव्ह’ आले आहेत. तसेच मुंबई येथून खेर्डा (ता. मालेगाव) येथे आलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह’ आला आहे. ११ जुनपर्यत जिल्हयात कोरोना रुग्णसंख्या २६ पर्यत पोहोचली असतांना आज १२ जुनच्या सायंकाळच्या अहवालानंतर या रुग्णसंख्येत १५ ने भर पडली आहे.
 दरम्यान जिल्हयातून आतापर्यत ६०७ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासण्यात आले आहेत. यापैकी दि. ११ जून पर्यत २६ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ५१९ अहवाल निगेटीव्ह आले असून १२ जूनपर्यत ६२ अहवाल प्रतिक्षेत होते. यापैकी १२ जुनच्या सायंकाळी १५ व्यक्तींचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यत सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे आरोग्य विभागासह पोलीस विभागाचीही जबाबदारी वाढली असून त्यांना आता अधिक सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. सोबतच नागरीकांचीही जबाबदारी वाढली असून मास्क व सैनिटायझरच्या नियमित वापरासह सोशल डिस्टंन्सिंगचे पालन काटेकोरणे करण्याची गरज आहे.