Ticker

6/recent/ticker-posts

येवती येथील विनाखर्चाची आदर्श लग्नगाठ : कोरोनावर मात, प्रशासनाला साथ


येवती येथील विनाखर्चाची आदर्श लग्नगाठ : कोरोनावर मात, प्रशासनाला साथ
आप्तजनांनी दिल्या मोबाईलवरुन शुभेच्छा : सत्यशोधक समाज जिल्हा कोषाध्यक्ष गणेश शिंदे यांचा पुढाकार
वाशीम : देशावर कोसळलेल्या कोरोना संकटाचे भान ठेवून रिसोड तालुक्यातील येवती येथील उच्चविद्याविभूषीत चि. अक्षय विजय शिंदे व मालेगाव तालुक्यातील कोठा येथील चि.सौ.कां. मनिषा रामदास अवचार या दाम्पत्यांनी कोणत्याही नातेवाईकांना न बोलावता तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देवून आई वडील व काका काकु इतक्याच आप्तांच्या उपस्थितीत 6 एप्रिल रोजी येवती येथे कुंकवाच्या कार्यक्रमात घेतलेल्या कपडयावरच अत्यंत साधेपणाने विवाह केला. या दाम्पत्यांचा विवाहाची तारीख 29 मे रोजी निश्‍चित झाली होती. परंतु देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या दाम्पत्यांनी परंपरा व खर्चाला फाटा देवून आदर्श अशी लग्नगाठ बांधली. यावेळी वर्‍हाडी, मित्रमंडळी, नातेवाईक व आप्तस्वकीयांनी या उभयतांना मोबाईलवरुनच शुभेच्छा देवून त्यांच्या या कार्याचे कौतुक केले. 
 वधु चि.सौ.कां. मनिषा ह्या एम. कॉम आहेत. तर वर चि. अक्षय हे बि.ई इंजिनिअरींग अरुन पुण्यात एका सोलर कंपनीत नोकरीला आहेत. तसेच सत्यशोधक समाजाचे वाशीम जिल्हा कोषाध्यक्ष गणेश नाना शिंदे यांचे चि. अक्षय हे पुतणे असून हा आदर्श विवाह घडविण्यासाठी गणेश शिंदे यांनी नातेवाईकांशी विचारविमर्श करुन यशस्वी पुढाकार घेतला. सध्या देशावर कोरोना या महामारीने विळखा घातला आहे. महाराष्ट्रात तर सर्वात जास्त लोकांना याची लागण होत आहे. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. अश्या प्रसंगी विवाहावर खर्च करणे योग्य नाही या बाबींचा सांगोपांग विचार करून ठराविक दिवस व मुहुर्ताचा विचार न करता हा आदर्श विवाह वरपक्ष व वधुपक्ष दोघांच्याही एकमताने पार पडला. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे कलम 144 लागू आहे. या शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून हा विवाह पडला. त्यामुळे अगदी शेजार्‍यांना सुद्धा विवाहाची कल्पना आली नाही. या आदर्श विवाहाचे परिसरात कौतूक केले जात आहे.