Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत क्वॉरंटाइनमधून पळालेल्या १५ जणांची धरपकड

मुंबईत क्वॉरंटाइनमधून पळालेल्या १५ जणांची धरपकड
मुंबई: करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते.
हे सर्वजण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. त्यांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.
हे १५ संशयित खारमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आमच्या पथकाने रेल्वे स्टेशनवर धाव घेतली आणि दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्यांना पकडून पालिका अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आलं. या सर्वांच्या हातावर क्वॉरंटाइन स्टँम्प लावलेला होता, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कब्दुले यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या ३८७वर पोहोचली आहे. एकट्या महाराष्ट्रातच ८९ करोना रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात करोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन आणि जमाव बंदी जारी करण्यात आली आहे.