Ticker

6/recent/ticker-posts

उद्धवजी, अभी नही तो कभी नाही; आव्हाडांचं ट्विट

उद्धवजी, अभी नही तो कभी नाही; आव्हाडांचं ट्विट
मुंबई: 'जमावबंदी आणि लॉकडाउनला न जुमानणाऱ्या जनतेला सक्तीनं घरी बसवण्यासाठी संचारबंदीच लावायला हवी, असं मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. 'अभी नही तो कभी नही', असं म्हणत आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसा निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे.
'करोना'चा प्रसार दिवसागणिक वाढत असून बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत हा आकडा ८९ वर पोहोचला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसंच, सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. एकप्रकारे महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. मात्र, सरकारच्या आदेशानंतरही लोक बिनधास्त रस्त्यावर येत आहेत. खासगी वाहने बाहेर दिसत आहेत. 
लोकांच्या या बेफिकिरीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर आव्हाड यांनी संचारबंदीची मागणी करणारं ट्विट केलं आहे. 'परिस्थिती गंभीर आहे. कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९ झालीय. तरीही लोक गंभीर दिसत नाहीत. मी स्वत: फिरून हा अनुभव घेतला. लोक ऐकत नाहीत. परिस्थितीचा विचार करता यावर संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे,' असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना टॅग करून त्यांनी ही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज ट्विट करून लोक लॉकडाउनला गांभीर्यानं घेत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 
दरम्यान, महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा आज १५ ने वाढला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.