Ticker

6/recent/ticker-posts

कुणी उपाशी राहणार नाही : 1 एप्रिलपासून तालुक्यातही शिवभोजनाची घोडदौड सुरु


कुणी उपाशी राहणार नाही : 1 एप्रिलपासून तालुक्यातही शिवभोजनाची घोडदौड सुरु
वाशिम, 30 मार्च - गोरगरीब व निराधारांना कमीत कमी पैशात पोटभर जेवण मिळावे या शिवसेना सरकारच्या उदात्त हेतूने 26 जानेवारीपासून जिल्हा ठिकाणी सुरु झालेल्या शिवभोजन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून आता करोना या वैश्‍विक महामारीचा संपुर्ण महाराष्ट्र संचारबंदी अंमलात आणून मुकाबला करत असतांना या संचारबंदीत गोरगरीब व निराधारांचे हाल होवू नये या हेतूने 1 एप्रिलपासून तालुकाच्या ठिकाणीही शिवभोजन योजना सुरु करण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने केले आहे. 
 याअंतर्गत जिल्ह्यातील पाच तालुका ठिकाणी शिवभोजनालय सुरु करण्यासाठी 900 थाळीचे उद्दीष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले असून रिसोड, कारंजा व मंगरुळपीर येथे प्रत्येकी 200 थाळी तर मालेगाव आणि मानोरा तालुक्याला प्रत्येकी 150 थाळीचे उद्दीष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती तालुकास्तरावर शिवभोजनालये सुरु करण्याची कार्यवाही करणार आहे. तालुकास्तरीय समितीने निश्चित केलेल्या शिवभोजनालयात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजनाचा लाभ घेता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.
 26 जानेवारीपासून वाशीम येथे जिल्हास्तरावर पाच ठिकाणी शिव भोजनालय सुरु करण्यात आले होते. याअंतर्गत शहरातील अकोला नाका येथील न.प. संकुल, रेल्वे स्टेशन परिसर, जुना रिसोड नाका, पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्स व महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ अशा पाच ठिकाणी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या शिवभोजन योजनेला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला असून शहरातील गोरगरीब नागरीक, निराधार व ग्रामीण भागातून शहरात येणारे शेतकरी वर्ग, महिला आदींना मोठा फायदा होवून त्यांच्या जेवणाची सोय झाली आहे.