Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे तिर्थक्षेत्र राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : राजगृहावर कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्ताचा निर्णय


मुंबई, दि. ८:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे.
            मुख्यमंत्री म्हणतात, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे.  राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राजगृहावर कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्ताचा निर्णय
 राजगृहावरील हल्ल्यानंतर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ’राजगृह’ला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनी ही मागणी केली आणि ती मागणी तातडीनं मंजूर झाली, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तत्पूर्वी, ’राजगृहावरील तोडफोड केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
 मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील सिसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे सिसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात.