Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती पूर्ण 408 विद्यार्थ्यांना मिळणार : सर्व पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा धनंजय मुंडे यांचा निर्णय


मुंबई, दि.8 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत  पीएचडी किंवा एमफिल चे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी (BANRF-2018) लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या केवळ 105 विद्यार्थ्यांना न देता परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व 408 विद्यार्थ्यांना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
      या फेलोशिपसाठी अर्ज दाखल केलेल्या पीएचडी अथवा एमफिलचे शिक्षण घेत असलेल्या सर्व 408 विद्यार्थ्यांना आता या फेलोशिपचा लाभ मिळणार असून या संबंधी सर्व 408 पात्र विद्यार्थ्यांना मेल द्वारे कळवण्यात आले आहे.
    बार्टीमार्फत 19 नोव्हेंबर 2018 रोजी यासाठी जाहिरात देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 597 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. यातून लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत या सर्व प्रक्रिया पूर्ण करून 408 विद्यार्थी पात्रता यादीत होते. बार्टीच्या नियमाप्रमाणे या पात्र यादीमधून पीएचडी साठीचे 60% व एमफिल साठी चे 40% असे एकूण 105 विद्यार्थी गुणवत्तेनुसार फेलोशिप साठी निवडले जातात, परंतु पात्र सर्वच विद्यार्थ्यांना फेलोशिपचा लाभ देण्यात यावा अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी श्री. मुंडे यांच्याकडे केली होती, त्यानुसार निर्णय घेऊन श्री. मुंडे यांनी सर्व पात्र 408 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला असून, फेलोशिप साठी पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे  आभार मानले आहेत.
     या निर्णयामुळे नियमित 105 विद्यार्थ्यांना द्यावयाच्या फेलोशिपसाठी 4 कोटी 22 लाख रुपये इतका निधी अपेक्षित असताना 408 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यास मान्यता दिल्याने 303 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी प्रथम वर्षाकरिता 12 कोटी 18 लाख रुपये इतका वाढीव निधी लागणार असल्याचे बार्टीचे संचालक कैलास कणसे यांनी सांगितले. पात्र सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केवळ या वर्षीच कोवीड-19 ची उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून घेण्यात आला आहे.