Ticker

6/recent/ticker-posts

जातिवादाचा कोरोना कधी नष्ट होणार ? केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा सवाल


जातिवादाचा कोरोना कधी नष्ट होणार ?
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा सवाल
औरंगाबाद मधील लाख गावच्या भीमराज गायकवाड या बौद्ध युवकाच्या हत्याकांडाचा तीव्र नीषेध; मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 19 -  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा  गावात गरीब बौद्ध कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.त्यातभीमराज  गायकवाड या निर्दोष  विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मानवतेला काळिमा फसणाऱ्या या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करून हल्लेखोरांना  कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
हल्ल्यात मृत भीमराज गायकवाडचे  वडील बाळासाहेब गायकवाड;आई अलका बाळासाहेब गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. या गायकवाड कुटुंबातील मोठ्या मुलाचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याच्या  संशयातून जातीवादी मानसिकतेतून हा हल्ला आरोपींनी केला आहे. अत्यंत अमानुष ;निंदनीय ;मानवतेला काळिमा फासणारा हा हल्ला असून हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी  करीत आहे. हल्ला झाल्याचे समजल्यानंतर काल त्वरित तेथील औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षकांशी  दूरध्वनी द्वारे संपर्क साधून  त्वरित सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करून बळीत भीमराज गायकवाड कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची  सूचना केली आहे.
याप्रकरणी मृत भीमराज गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी  डीवायएसपी यांना निवेदन देऊन आपल्या जीवाला धोका असून हल्ला होण्याची शक्यता वर्तवुन
पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे. या बाबत राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. कोरोना या साथीच्या रोगाला अटकाव घालण्यास सरकार आणि समाज गुंतले असले तरी शेकडो वर्षांपासून थैमान घालणाऱ्या जातीवादाच्या कोरोनावर सरकारसोबत मिळून  समाज  कधी आळा घालणार आहे असं उद्विग्न सवाल ना रामदास आठवले यांनी केला असून आम्ही जातीवादाचा कोरोना नष्ट करण्यासाठी समतेची  लढाई लढत असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.