Ticker

6/recent/ticker-posts

समारंभ, कार्यक्रमप्रसंगी जमाव करण्यास मनाई


समारंभ, कार्यक्रमप्रसंगी जमाव करण्यास मनाई
कार्यक्रमांना पूर्वपरवनागी आवश्यक
कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना
वाशिम, दि. २१ : एकाच ठिकाणी होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लग्न, वाढदिवस, वास्तुशांती यासारख्या कार्यक्रमाकरिता ५० पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अशा कार्यक्रमांना तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा नगरपरिषद, नगरपंचायत मुख्याधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा संसर्ग एका संक्रमित रुग्णाकडून त्याच्या संपर्कात येणाऱ्या अन्य व्यक्तींना होतो. त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जिल्ह्यात लोकांचा समूह एकत्र जमून होणाऱ्या गर्दीला प्रतिबंध करण्यात आला आहे.
जिल्ह्यात लग्न, वाढदिवस, वास्तुशांती यासारख्या कार्यक्रमाकरिता एकाच ठिकाणी ५० व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती जमाव करणार नाहीत तसेच अशा कार्यक्रमांना संबंधित तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी किंवा संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या लोकांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यक राहील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.